महानोरांच्या केसाला जरी हात लावाल तर, संभाजी ब्रिगेडचा इशारा
उस्मानाबादेत आजपासून (शुक्रवार) 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. 'संमेलनाला जाऊ नका', अशी धमकीच ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने ब्राह्मण महासंघाला इशारा दिला आहे. 'धमकी' देणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या पांढऱ्या बगळयांनो..महानोर सरांच्या केसाला जरी हात लावला ना...तर महाराष्ट्रात तुम्हाला राहायला घर उरणार नाही आणि सांगायला डीएनए...! लक्षात ठेवा गाठ, आमच्या मावळ्यांशी आहे.' अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
महानोरांना दिली धमकी
संमेलनाध्यक्षांची निवड आम्हाला मान्य नाही, असे म्हणत संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष असणाऱ्या ना. धों. महानोर यांना करण्यात आले आहे. 'साहित्य संमेलनाला जाऊ नका', अशी धमकीच ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना दिली आहे. याची तातडीने दखल घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ पोलिस संरक्षणाचे आदेशही दिले आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यपदी निवड झाल्यानंतर समाजातील काही गटांनी त्याला विरोध केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, महानोर यांना कोणी धमकी दिली याची चौकशी पोलिसांना करण्यास सांगितलं आहे. तात्काळ पोलिस संरक्षण देण्याचे संबंधित जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सांगितलं असल्याचं ते म्हणाले. यासंबंधी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महानोर यांनी संमेलनाला जाऊ नका, असं पत्र आल्याचं मान्य केलं. पण तरीही ते उस्मानाबादला दाखल झाले आहेत.
महानोर म्हणाले, "ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नावाने पत्र आले आहे. फादर दिब्रेटो यांची निवड सर्वानुमते झाल्याचं मी त्यांना सांगितले. त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असे सांगितल्यावरही त्यांचे उस्मानाबादला जाऊ नका सांगणारे फोन आले."
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून वाद पेटला
यंदाचे संमेलन अराजकीय असल्याने कुठल्याही राजकीय नेता किंवा लोकप्रतिनिधी व्यासपीठावर दिसणार नाही. मात्र, मराठी साहित्य संमेलनाला असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा संमेलनाध्यक्ष निवड वा मानपानावरून नाही तर माजी संमेलनाध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.
भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. 93 व्या साहित्य संमेलनात या पुस्तिकेच्या निषेधाचा ठराव घ्यावा, अशी मागणी वीर सावरकर विचार परिवारने केली आहे. तर दुसरीकडे, असा ठराव घेतल्यास आम्ही संमेलनाचा निषेध करू,असा इशारा काँग्रेसने दिला आहे. यावरून हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.
1938 मध्ये 23 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सावरकर...
वीर सावरकर विचार परिवारच्या वतीने संमेलनाच्या स्वागतध्यक्षांना दिलेल्या निवेदनात सावरकरांविषयी सेवा दलाच्या पुस्तिकेतील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे. भोपाळच्या अधिवेशनात सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा असलेली ही पुस्तके वितरित केली गेली. 1938 मध्ये मुंबईमध्ये पार पडलेल्या 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर होते. त्यामुळे सावरकरांवरील वक्तव्याचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
..थेट संमेलनाचा निषेध करू
संमेलनात सेवा दलाच्या निषेधाचा ठराव घेतल्यास काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत. या संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी असल्यामुळे संमेलनात असा कुठलाही ठराव घेतला जाणार नाही, मात्र तरीही तसा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा एनएसयूआयचे जिल्हा उपाध्यक्ष राेहित थिटे यांनी दिला आहे.
Post a Comment