औरंगाबादही हादरलं, घरात घुसून बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं
![]() |
औरंगाबादही हादरलं, घरात घुसून बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं |
हिंगणघाट इथे झालेल्या प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं आहे. तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये पीडित महिला 95 टक्के भाजली असल्याचं सांगण्यात येत आहे. घटना घडताच पोलिसांनी आरोपी संतोष मोहिते याला अटक केली आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील ही घटना आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय पीडित महिला यामध्ये गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गावात राहणारा आहे. संतोष मोहिते असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी संतोष मोहिते हा गावात बिअर बार चालवतो. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान सोमवारी वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यपिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्राध्यापिका जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीची पत्नी म्हणाली, 'ते असं काही करतील, असं वाटलं नव्हतं. त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता. घटना घडली त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते प्रचंड अस्वस्थ होते. ते सारखे घराबाहेर जात होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होते. सकाळी उठून ते कामाला जातील म्हणून मी त्यांच्यासाठी डबा करून दिला. मात्र, ते काहीही न सांगता घराबाहेर पडले आणि काही वेळातच या घटनेची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.'
Post a Comment