सेलिब्रिटी कॅन्सरविरोधात लढले आणि जिंकले
कॅन्सर म्हणजे श्रीमंतांचा रोग असेही म्हटले जाते, नर्गिसच्या कॅन्सरवरील
उपचारासाठी सुनील दत अमेरिकेत गेल्याने त्या मुद्द्याला पुष्टीच मिळाली.
अर्थात, आजही मध्यमवर्ग आणि गरीब यांच्या आवाक्यात कॅन्सर नाही. त्यावरील
उपचाराच्या खर्चानेच दबून जाणे स्वाभाविक आहे. पण कॅन्सरवर मात करून पुन्हा
आपण पहिल्यासारखे आयुष्य जगू शकतो, असा विश्वास मात्र आता वाढत चाललाय आणि
त्यासाठी पुन्हा सेलिब्रिटीज हेच नवीन संदर्भ ठरत आहेत. आजच्या जागतिक
कॅन्सर दिनानिमित्त जाणून घेऊयात अशाच काही कॅन्सरवर मात करणाऱ्या
सेलिब्रिटीजबद्दल...
माहिरा कश्यप - अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला
स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र आता या आजारातून ती पूर्णपणे बरी
झाली आहे. ताहिरा मोठ्या धीराने या आजाराला सामोरी गेली असून सध्या ती
कॅन्सर जागृतीसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. यावेळी ती
आजारपणाच्या काळातील तिचा अनुभव शेअर करत आहे.
लीसा रे - अभिनेत्री लिसा रे सध्या चंदेरी दुनियेतून लांब आहे. कर्गरोगावर
मात करणारी लिसा सध्या महिला सबलीकरण, कर्करोगावरील रुग्ण आणि योगाचा
प्रसार यासाठी काम करताना दिसत आहे. "कर्गरोगामुळे मला जीवनाचे महत्त्व
समजले. जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, कोणत्या गोष्टीला
प्राधान्य द्यावे याची शिकवण मला कर्करोगाने दिली," असं लिसा सांगते.

मनिषा कोईराला - अभिनेत्री मनिषा कोइरालाला कर्करोगातून मुक्तता मिळून नवे
आयुष्य मिळाले. २०१३ मध्ये अमेरिकेत तिच्यावर सहा महिने उपचार सुरु होते.
कर्करोगमुक्त झाल्यानंतर मनिषाने अनेकांना तिच्या संघर्षकथेतून प्रेरणा
दिली.


युवराज सिंग - भारताचा शैलीदार डावखुरा फलंदाज युवराज सिंग २०११ साली
कर्करोग झाल्याचे समोर आले. मात्र काही वर्ष या आजाराशी दोन हात केल्यानंतर
तो यातून पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं. २०१७
साली जानेवारी महिन्यात इंग्लंविरुद्ध कटकमध्ये झालेल्या वनडे सामन्यात
युवराजने १२७ चेंडूत १५० धावांची दमदार खेळी करत सामनावीराच्या पुरस्कार
पटकावला. "कॅन्सरवर मात केल्यानंतर पहिले दोन ते तीन वर्ष माझ्यासाठी खूप
कठीण होते. संघात मला स्थान मिळत नव्हते. मला फिटनेसवर खूप मेहनत करावी
लागली. संघात निश्चित अशी जागा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे क्रिकेटमधून
निवृत्ती घेण्याचा विचार देखील मनात आला होता. पण परिस्थितीपुढे हार मानने
मला पटले नाही. वेळ नक्की बदलेल असा माझा विश्वास होता आणि विराट कोहलीने
माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी पुनरागमन करू शकलो," अशा भावना या
सामन्यानंतर युवराजने व्यक्त केल्या होत्या. "मला कर्करोग आहे, ही जाणीव
खूप निराश करणारी होती. पण ती नैराश्याची एक ‘फेज’ असते. पण त्यापासून दूर
पळणे तर शक्य नव्हतेच. जगण्यासाठी तुम्हाला लढा द्यावाच लागतो," असं
युवराजने कॅन्सरच्या लढ्याबद्दल बोलताना म्हटलं होतं.

सोनाली बेंद्रे - सोनालीने अमेरिकेत कॅन्सवर उपचार घेतले. ती आता पूर्णपणे
कॅन्सरमुक्त झाली आहे. उपचार घेताना ती स्वतः अनेक फोटो ट्विट करत
आपल्यावरील उपचारांची माहिती देत होती. सोशल मिडियावरुन ती वेळोवेळी
अपडेट्स देत होते त्यामुळे तिच्या उपचारांची योग्य माहिती मिळत राहिली आणि
उगाचच गैरसमज झाले नाहीत. सोनालीचा हा दृष्टिकोन अगदी योग्य होता. अन्यथा
उगाच काहीतरी गैरसमज निर्माण होतात.

इरफान खान - लंडनमध्ये न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर
अभिनेता इरफान खान मागील वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात
दाखल झाला. मुंबईत परतल्यानंतर काहीच दिवसांत त्याने ‘हिंदी मीडियम २’च्या
चित्रिकरणाला सुरुवात केली. इरफानला कॅन्सर झाल्याची माहिती त्याने स्वत:
सोशल मीडियावर दिली होती.

ऋषी कपूर - बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर २०१८ पासून कर्करोगाशी झूंज देत होते.
ऋषी कपूर २०१८ साली सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी
न्यूयॉर्कला रवाना झाले होते. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर
कर्करोगाशी झूंज जिंकली आणि ते २०१९ साली सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात
परतले.

राकेश रोशन - अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान झालं
होतं. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला होता. मुलगा
ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली
होती.

अनुराग बसू - अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या अनुराग बसू यांनाही
कर्करोग झाला होता. 'बर्फी', 'लाइफ इन अ मेट्रो', 'गँगस्टर' यासारखे
चित्रपट देणाऱ्या अनुराग यांना रक्ताचा कर्गरोग झाला होता. तुम्ही केवळ दोन
महिने जगू शकता असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र आपल्या
इच्छाशक्तीच्या जोरावर अनुराग यांनी कर्करोगावर मात केली आहे.
Post a Comment