 |
'महाआयटी'ने परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले |
राज्यातील 'मेगाभरती'साठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद केल्यानंतर, आता राज्य सरकारच्याच महाआयटी विभागाने नव्या स्वरूपात आयटी कंपनीमार्फत सुरू करण्याचा घाट घातला आहे. 'महाआयटी'ने सरकारी विभागांच्या परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले असून, त्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पदभरतीच्या परीक्षा एमपीएसद्वारे घेण्यात याव्यात, या राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या; तसेच लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
गेल्या सरकारने सरकारी पदभरतीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी महाआयटी विभागामार्फत महापरीक्षा पोर्टलची निर्मिती केली होती. या पोर्टलद्वारे कंत्राट मिळालेल्या खासगी आयटी कंपन्यांच्या साह्याने पदभरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, या परीक्षांमध्ये सुरुवातीपासून गैरप्रकार झाले. त्यातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यभर गोंधळ झाला. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वेळोवेळी वृत्तांद्वारे प्रकाश टाकला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टलकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली. त्यानंतर सरकारने पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या वेळी पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी नव्या यंत्रणेची निर्मिती करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
|
'महाआयटी'ने परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले |
|
'महाआयटी'ने परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले |
मात्र, पदभरतीच्या परीक्षांमध्ये पुन्हा गोंधळ व गैरप्रकार होऊ नये, यासाठी या परीक्षा 'एमपीएससी'कडून घेण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत होती. राज्य सरकारचे मंत्री, सत्ताधारी पक्षातील आमदाराही एमपीएससीसाठी आग्रही आहे. त्यामुळे आता पदभरतीच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होतील, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, महाआयटी विभागाने शुक्रवारी पदभरती परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले असून, त्याची जाहिरात प्रकाशित केली आहे. येत्या ३० मार्चपर्यंत कंत्राट मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी आता नव्या खासगी आयटी कंपनीची नेमणूक होणार असून, त्याद्वारे परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने पोर्टल बंद करण्याऐवजी तत्कालीन आयटी कंपनी बरखास्त केली होती. आता कंत्राट पद्धतीने नव्या आयटी कंपनीची निवड केल्यावर, एकप्रकारे महापरीक्षा पोर्टलच सुरू होणार आहे. या निर्णयाला उमेदवारांचा तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
Post a Comment