जनतेच्या लढ्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती - पंतप्रधान मोदी
सध्या देशात करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असं असलं तरी इतर देशांच्या
तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केलं. “या वर्षाच्या सुरूवातीस काही लोकांचा असा अंदाज होता की
भारतात करोना विषाणूचा परिणाम खूप तीव्र स्वरूपाचा असेल. लॉकडाउन, सरकारने
घेतलेले पुढाकार आणि जनतेनेचा लढा या कारणास्तव भारत इतर देशांच्या तुलनेत
चांगली स्थिती आहे,” असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.
डॉ.जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या ९० व्या जयंतीनिमित्ता आयोजित
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी
झाले होते. “दिल्लीतील आरामदायी सरकारी कार्यालयांमधून नव्हे तर लोकांच्या
अभिप्रायानंतर आम्ही निर्णय घेतले आहेत,” असं मोदी यावेळी म्हणाले. भारतात
इतर राष्ट्रांच्या तुलनेत स्थिती चांगली आहे. तसंच भारतातील रुग्ण बरे
होण्याचा दरही वाढत आहे. कोणाचीही मृत्यू होणं ही दुर्देवी बाब आहे. देशात
एक दशलक्ष लोकसंख्येमागे १२ मृत्यूंची नोंद आहे. तर इटलीमध्ये हाच दर एक
दशलक्ष लोकसंख्येमागे ५०० इतका आहे. लोकांच्या सहकार्यामुळे करोनाचा
प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्यासारखे प्रकार आपल्याला करायला हवे, असंही
त्यांनी नमूद केलं.
८ कोटींहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करण्यात आलं
आहे. त्यांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहे. बेघरांना आश्रय देण्यासाठी
दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली आहेत. तसंच आयुष्यमान भारत ही जगातील
सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचं मोदी म्हणाले.
Post a Comment