केवळ ताप मोजणं ही मोठी चूक; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करोना प्रसाराचं कारण

महाराष्ट्रात करोनानं शिरकाव करून अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला
आहे. या काळात राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली
आहे. महाराष्ट्र करोना कसा आला आणि करोनाग्रस्त रुग्णांना वेगळं करण्यात
कोणत्या चुका झाल्या, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
निरीक्षण नोंदवत भूमिका मांडली. त्याचबरोबर करोनाची परिस्थिती हाताळत
असताना केंद्र आणि राज्यातील समन्वयाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी मोठं भाष्य
केलं.
महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित
करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची
सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी
मुख्यमंत्री ठाकरे राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्याचबरोबर करोनाचा
शिरकाव होताना झालेल्या चुकांबद्दलही भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
म्हणाले, “महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळला. पुण्यात
हा रुग्ण आढळून आला. डॉक्टरांना वेगळी लक्षणं दिसून आल्यानंतर करोनाचा
शिरकाव झाल्याचं कळालं. दुबईला ४० जणांचा ग्रुप फिरण्यासाठी गेला होता.
त्यात हा रुग्ण होता,” असं ठाकरे म्हणाले.
“करोनाचा जगभर प्रादुर्भाव झालेला असताना हे महाराष्ट्रीय नागरिक
दुबईतून परतले. त्यावेळी त्यांची तपासणीच झाली नाही. कारण केंद्र सरकारनं
कोणत्या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, याबद्दल एक यादी
निश्चिच केली होती. त्या यादीमध्ये दुबई आणि युएई यांचं नावच नव्हतं. खरंतर
याच ठिकाणाहून सर्वाधिक बाधित नागरिक भारतात आणि महाराष्ट्रात आले.
साहजिकच नंतर ते स्थानिक लोकांमध्ये मिसळून गेले आणि त्यातून करोना पसरत
गेला. यात एक मोठी चूक जी मला वाटते, ती म्हणजे विमानतळावर येणाऱ्या
प्रवाशांचं होणारं स्क्रिनिंग. केवळ ताप तपासणी करणं ही चूक आहे. काही
प्रवासी ताप येतोय म्हणून औषधी घेतात. त्यामुळे स्क्रिनिंग वेळी त्यांचा
ताप नॉर्मल दिसून येतो. पण, करोनाची लक्षणं त्यांच्यात तशीच राहतात.
त्यामुळे त्यांची करोना चाचणी करणंच आवश्यक होतं. जेणेकरून प्रसार थांबवता
आला असता.,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Post a Comment